वाचा व आपले कमेंटस करा.......
सिकंदराने आपल्या जग जिंकण्याच्या महत्वाकांक्षेने आपले छोटेसे राज्य भारावून टाकले. जग जिंकायची तयारी घराघरातून सुरू झाली.
खास तयार केलेली कवायती फौज, जलद हालचाल करणारी घोड्याची पथके, युद्ध सामग्रीचे कारखाने आणि प्रत्येकाच्या मनात नवीन नवीन प्रदेशातून आपण लुटून आणणाऱ्या अमाप संपत्तीची स्वप्न घेऊन सिकंदराच्या फौजेची घोडदौड सुरू झाली. हजारो मैलाचा प्रदेश जिंकला गेला. अनेक राज्ये उलथून पडली. एकसंध साम्राज्याचा पट्टा तयार होत गेला. जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था मार्गी लागली की लगेच पुढच्या प्रदेशावर आक्रमण. पारंपारिक युद्धतंत्राला फाटा देऊन आधुनिक तंत्राचा वापर युद्धात करून शत्रुला पादाक्रांत केले जाऊ लागले. सुरूवातीला सिकंदराच्या फौजेचा आकार छोटा होता. पण जिंकलेल्या प्रदेशातून सैन्य भरती सुरू केली. ते सैन्य आघाडीवर पाठविले जाऊ लागले.
नवीन जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था राखण्यासाठी, तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनुभवी, वृद्ध, अपंग, जखमी झालेले सैनिक यांचे पुनर्वसन करण्यात आले.
त्यासाठी त्यांना भरपूर संपत्ती देण्यात आली. त्यामुळे प्रशासकाचा एक नवीन वर्ग तयार झाला. त्याबरोबर मायदेशातून सतत नवीन तरूणांचा भरणा सैन्यात होत होता.
सिकंदराने आपल्या कडव्या सैनिकांसह भारताचे प्रवेशद्वार ठोठावले. लहान लहान पहाडी राज्ये जिंकली. सरहद्दीवरील अंभीच्या मोठ्या राज्याशी तह केला.
सिकंदराचे सैन्य आणि अंभीचे सैन्य यांच्या संयु्क्त फौजांनी पोरसच्या राज्यावर आक्रमण केले. नवीन युद्ध तंत्रामुळे पोरसच्या हत्तीदळाचा पराभव झाला. पोरस पराभूत होऊन बंदीवान बनला. परंतू या युद्धात भारतीयांनी केलेल्या चिवट प्रतिकारामुळे सिकंदराची गुर्मी उतरली.
आपण संपूर्ण भारत जिंकू शकणार नाही याची खात्री त्याला पटली. त्याने पोरसशी तह केला आणि मायदेशी प्रयाण केले. परंतू मायदेशात तो पोहोचू शकला नाही.
बॅबीलॉन या ठिकाणी वयाच्या 32 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. म्हणजेच वयाच्या 32 वर्षापर्यंत त्याने अतुलनीय पराक्रमाने बराचसा मोठा प्रदेश जिंकलेला होता.
अत्यंत महत्वकांक्षेने पछाडलेल्या सिकंदराला भारत जिंकता आला नाही. पण सिकंदराचे स्थान इतिहासात अजरामर झाले हे विसरून चालणार नाही.
सिकंदराने जीवनाचे ध्येय ठरविले होते. Low aim is Crime अल्प ध्येय समोर ठेवणे हा गुन्हा आहे.
त्यासाठी सर्वात मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवले पाहिजे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी जबरदस्त महत्वाकांक्षा असावयास हवी तरच आपण आपल्या ध्येयाजवळ निश्चितपणे पोहोचू शकतो. आपल्या मार्गात येणारे अडथळे तर आहेतच. ते आज आहेत, काल होते आणि उद्याही असणारच आहेत. मग तुमच्या मनातील महत्वकांक्षा काय आहे ?
तेच जिणं जगायचं की त्यात बदल घडवायचा. हे तुमच्या हातात आहे. ते तुम्ही ठरवा. पण हेही लक्षात ठेवा की प्रगती करावयाची असेल, अत्युच्च ठिकाणी पोहोचावयाचे असेल तर प्रखर महत्वाकांक्षा मनात ठेवा. कठोर परीश्रम करा आणि यशाच्या शिखरावर जा.
जरी प्रयत्न करताना खाली पडलात तरी किती उंचीवरून खाली पडलात हे तरी जगाला कळेल. कारण तितक्या उंचीवर जाऊन कुणीच खाली पडलेलं नसतं.